७ चक्र आणि त्यांचे महत्व
आध्यात्मामध्ये ७ चक्रे याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. ही चक्रे जागृत झाल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होणे अशक्य आहे. अनेक भारतीय ग्रंथात ह्या सातही चक्राचे वर्णन आहे. ज्ञानेश्वरी मध्ये सहाव्या अध्यायातही याचे वर्णन आहे. मानव शरीरात असलेली ७ चक्रे ही ऊर्जा केंद्रे आहेत, जी शरीरातील भौतिक, मानसिक, आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या चक्रांना जागृत करून घेतल्याने आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते. कुंडलिनी शक्ती ही आपल्यात असलेली सुप्त ऊर्जाशक्ती आहे, जी प्रत्येक चक्रांमधून वरवर जात, आत्मा आणि परमात्म्याशी आपला संबंध दृढ करते.

१. मूलाधार चक्र
मूलाधार चक्र शरीराच्या तळाशी, गुदाशयाजवळ असते. हे चक्र आपल्या जीवनातील स्थैर्य, सुरक्षितता आणि भौतिक आधाराचे प्रतिनिधित्व करते. याची देवता श्री गणेशजी आहे. मूलाधार जागृत झाल्यावर आपल्या जीवनात सुरक्षा, मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो तसेच साधकांमध्ये पवित्रता, अबोधिता हे गुण वाढीस लागतात.
२. स्वाधिष्ठान चक्र
मूलाधाराच्या वर स्वाधिष्ठान चक्र आहे, जे जननेंद्रियांजवळ स्थित असते. हे चक्र आपल्यात असलेल्या सर्जनशीलता, इच्छाशक्ती, आनंद आणि संबंध यांचे प्रतिनिधित्व करते. याच्या जागृतीने मानवी जीवनात निर्माणक्षमता, कल्पकता आणि भावनात्मक स्थिरता येते. या चक्रात श्री ब्रह्मदेव सरस्वती विराजमान आहेत.
३. मणिपूर चक्र (नाभी चक्र)
नाभीच्या परिसरात असलेले मणिपूर चक्र आपल्या शांती, समाधान आत्मसन्मान आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे. हे चक्र जागृत झाल्यावर व्यक्तीमध्ये उदारता आणि आत्मशांतीची वाढ होते. या चक्रावर श्री लक्ष्मी नारायण देवता विराजमान आहेत. मणिपूरच्या जागृतीने आपल्यात असलेली इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि कार्यक्षमतेत सुधारणा होते.
४. अनाहत चक्र (हृदय चक्र)
हृदयाजवळ स्थित असलेले अनाहत चक्र प्रेम, करुणा, दया, आणि संतुलनाचे प्रतीक आहे. या चक्राच्या जागृतीमुळे आपल्यात नि:स्वार्थी प्रेम, सहानुभूती आणि दयाळूपणा जागृत होतो. या चक्रावर श्री शिव पार्वती देवता विराजमान आहेत. अनाहत चक्राने व्यक्तिमत्वात आत्मीयता व इतरांशी जोडलेले नाते सुदृढ होते.
५. विशुद्धी चक्र
गळ्याच्या ठिकाणी असलेले विशुद्ध चक्र आपली संवादक्षमता, सर्जनशीलता व्यक्त करण्याचे प्रतीक आहे. हे चक्र जागृत झाल्यावर व्यक्तीमध्ये स्पष्टता, सत्य बोलण्याची शक्ती, माधुर्य आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. या चक्रावर श्री राधा-कृष्ण विराजमान आहेत. विशुद्धी चक्राने साधकास स्वत्व जाणून घेण्याची क्षमता मिळते.
६. आज्ञा चक्र
कपाळ प्रदेशात स्थित असलेले आज्ञा चक्र आपल्या अंतर्ज्ञान, क्षमाशक्ती आणि निर्विचार शक्तीचे केंद्र आहे. हे चक्र जागृत झाल्यावर व्यक्ती क्षमाशील बनते आणि त्याला निर्विचार अवस्था प्राप्त होते. या चक्रावर येशू ख्रिस्ताचे स्थान आहे. त्यांनी क्षमेचा महान संदेश देऊन आज्ञा चक्र उघडले.
७. सहस्त्रार चक्र
सर्वात वर, मस्तकाच्या शिखरावर असलेले सहस्त्रार चक्र आत्मसाक्षात्काराचे प्रतीक आहे. हे चक्र जागृत झाल्यावर व्यक्तीला परमशांती, आनंद आणि परमात्म्याशी एकरूप होण्याची अनुभूती येते. हे चक्र जागृत होणे म्हणजे संपूर्ण चक्र यात्रा पूर्ण होणे आणि आत्म्याचे परमात्म्याशी एकात्मिकरण होणे.
कुंडलिनी शक्ती आणि ७ चक्रांवरील प्रभाव
कुंडलिनी शक्ती ही मूलाधार चक्रात सुप्तावस्थेत असलेली दिव्य ऊर्जा आहे. ध्यान, साधना, आणि योगाच्या साहाय्याने हळूहळू ही शक्ती जागृत होते आणि एकेक चक्र पार करत वरवर चढते. प्रत्येक चक्रावर तिचा थोडा वेळ थांबणे म्हणजे त्या त्या क्षेत्रात लागणारी ऊर्जा प्रवाहित करणे होय. कुंडलिनी ही सातही चक्रांवर गेल्यावर सहस्त्रार चक्रात प्रवेश करते. यावेळी साधकाला परम आनंद, शांती, आणि साक्षात्काराचा अनुभव येतो.
चक्रांचे जागरण आणि आत्मसाक्षात्कार
सातही चक्रे जागृत झाल्यानंतर व्यक्तीला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. यामुळे साधकाला स्वतःची ओळख होते, की आपण शरीर आणि मनाच्या पलीकडे असलेला शुद्ध आत्मा आहोत. हा आत्मसाक्षात्कार साधल्यामुळे जीवनातील मोह, दुःख आणि अज्ञानाची बंधने तुटतात. साधकाला परमात्म्याशी एकरूप होण्याची, त्याच्या अनंत स्वरूपाशी संपर्क साधण्याची संधी मिळते. त्याच्या दोन्ही हातातून व टाळू भागातून चैतन्य लहरी वाहू लागतात.
चक्र आणि आध्यात्मिक प्रगती
चक्रांच्या जागृतीमुळे साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीला गती मिळते. व्यक्तीमध्ये प्रेम, करुणा आणि शांततेची अनुभूती येते, ज्यामुळे त्याचे सर्वांशी असलेले संबंध सुधारतात. सातही चक्रांमधून उर्जेचे प्रवाहित होणे म्हणजे व्यक्तीला संतुलित आणि आध्यात्मिक जीवनाची अनुभूती मिळणे. चक्रांचा विकास म्हणजे अंतर्मुख होऊन परमशांतीचा अनुभव घेणे.
अशा प्रकारे ७ चक्रे आपल्या अंतर्गत शक्ती आणि जीवनशक्तीचा प्रवाह नियंत्रित करतात. कुंडलिनी शक्ती जागृत करून सातही चक्रांचे संतुलन साधल्यास मानवी जीवन आनंदी, संतुलित आणि शांतीपूर्ण होते.
सातही चक्रे जागृत करण्यासाठी व आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी ह्या संकेत स्थळाला नक्की भेट द्या. https://www.sahajayoga.org.in/ हे विनामूल्य आहे.
By Mahesh Walhe