निरभ्र:
मिट्ट काळोखी रात्र…हाडं गोठवणारी थंडी…चोहीकडून होणारा गोळ्यांचा वर्षाव…शत्रू कोण, मित्र कोण काहीही समजायला मार्ग नाही इतकी धुमश्चक्री चालू…इतक्यात एका शक्तिशाली बॉम्बस्फोटामुळे सैनिकांची एक छावणी डोळ्यांचं पातं लवतंय न लवतंय तोच बेचिराख झाली. छावणीच्या आडोश्याला थांबून, शत्रूवर गोळीबार करणारे न जाणो किती सैनिक क्षणात…! इतक्यात एका जखमी सैनिकाच्या कण्हण्याचा आवाज तिला ऐकू आला. तो सैनिक दुसरा-तिसरा कोणी नसून श्री, तिचा नवरा होता. ती मदतीला धावणार एवढ्यात एक गोळी सूं-सूं आवाज करत त्याच्या दिशेने आली आणि…
मनाला एक हिसका बसूनच मुग्धा झोपेतून दचकून जागी झाली. सगळं अंग थरथरत होतं, घशाला कोरड पडली होती. श्रीचं पोस्टिंग, लेह-लडाख बॉर्डरला झाल्यापासून कित्येकदा तिला अशीच स्वप्नं पडत होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवडयातच त्याला तातडीने जावं लागलं होतं. मनात धडकी भरवणाऱ्या, अतिरेक्यांच्या एकेक कारवाया कानी पडत होत्या, आणि त्याचबरोबर आपल्या इंडियन आर्मीच्या शौर्याच्या गाथा ऐकून तिची मान अभिमानाने उंचावत होती.

देशभक्ती तिच्या नसानसांत भिनलेली असण्याचं कारण ती एका शहीद ब्रिगेडिअरची मुलगी होती, आणि आता एका ब्रिगेडिअरची पत्नी होती. श्रीचं आत्ता नुकतंच या पोस्टवर प्रमोशन झालं होतं.
प्रमोशननंतर ही पहिलीच कामगिरी होती; पण गेल्या महिन्यापासून श्रीबरोबर कुठलाच संपर्क होऊ शकत नव्हता. त्याचा मोबाईल रेंजच्या बाहेर होता. हेडक्वार्टरचाही लँडलाईन बंद येत होता.
मुग्धा एका नावाजलेल्या कॉलेजमध्ये मराठीची प्रोफेसर होती. शिवाय समुपदेशक म्हणूनही ती तिथेच कार्यरत होती. अतिशय लाघवी, गोड स्वभावाची आणि दिसायलाही तितकीच गोड असणारी मुग्धा, कॉलेजमध्ये सगळ्यांची आवडती होती. सध्याच्या युवापिढीची मानसिकता बघता, त्यांना समुपदेशनाची गरज भासायचीच.
मुग्धा ते अगदी लीलया करु शकत होती. त्याच बळावर तर तिने स्वतःलाही, या परिस्थितीत कसंबसं सावरलं होतं.
आज चौदा फेब्रुवारी, ‘व्हॅलेंटाईन्स डे’, प्रेमीजनांसाठी खास असा दिवस. मागच्या आठवड्यात तिने श्रीसाठी एक व्हॅलेंटाईन
कार्ड पाठवलं होतं. पत्ता लिहिताना तिचे हात कंप पावत होते. पत्ता कुठला लिहायचा? सीमेवर, बर्फाखाली? का बेचिराख झालेल्या छावणीत सापडलेल्या अनेक सैनिकांच्या राशीत? पण तिला पूर्ण खात्री होती, तिचा श्री नक्की परत येणार. दोन वर्षांपूर्वी तर त्यांचं लग्न झालं होतं. दोघांचं अगदी जिवापाड प्रेम होतं एकमेकांवर. ही साथ शेवटपर्यंत टिकणारच होती, इतका गाढ विश्वास होता तिला.
एवढ्यात दारावरची बेल वाजली. मॉर्निंग वॉकहून आई आली असणार, असा विचार करत ती उठली. दार उघडल्यावर तिची आई आत आली. ती सध्या मुग्धाला सोबत म्हणून इथे रहायला आली होती.
आत येताक्षणी ती जरा चिडूनच मुग्धाला म्हणाली, “तुझ्या शेजारच्या त्या बर्वेकाकू किती भोचकपणा करतात गं. दोनच दिवसांपूर्वी मी त्यांना सांगितलं होतं, अजून श्रीबरोबर संपर्क नाही झालेला; पण आज परत तेच विचारत होत्या. समोरच्याची मनःस्थिती काय आहे, आपल्या बोलण्यामुळे त्याला खरंच आधार मिळाल्यासारखा वाटणार आहे का, कशाचाही विचार न करता फक्त स्वतःचं कुतूहल शमवून घ्यायचं.”
“जाऊ दे ना आई. तू कशाला त्रास करुन घेतेस? त्यांचा श्रीवर जीव आहे गं. अगदी लहानपणापासून त्याला पहात आल्यात त्या. आई-अण्णा गेल्यापासून, आमचं लग्न होईपर्यंत तर त्या श्रीची अगदी मायेने काळजी घेत होत्या. त्याच्या आवडीचा पदार्थ अजूनही आवर्जून पाठवतात.”
“मीपण या परिस्थितीतून गेले आहे मुग्धा. तू अगदी लहान असताना तुझ्या बाबांना वीरमरण आलं होतं. तेव्हा सगळ्यांनी पोकळ आश्वासनं तर खूप दिली होती; पण प्रत्यक्षात एकाचीही पूर्तता झाली नव्हती. तुला पाळणाघरात नाईलाजाने ठेवून, मला नोकरीसाठी बाहेर पडावं लागलं होतं. माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ बघणारे कमी नव्हते. सगळ्या आघाड्यांवर, तेव्हा मीसुद्धा लढले होते. तुला श्री बरोबर लग्नासाठी विरोध केला होता तो तेवढयासाठीच. आपलंसुध्दा सगळं आयुष्य लढण्यातच जातं, फक्त ते दुसऱ्या कोणाला जाणवत नाही इतकंच.”
मुग्धाने आईला मायेने थोपटले आणि म्हणाली, “चल, मी आवरते पटकन. कॉलेजला जायला उशीर होईल नाहीतर.”
कॉलेजमध्ये आज विद्यार्थ्यांची संख्या नेहमीपेक्षा कमी होती. मग तिच्या लक्षात आलं, आज ‘व्हॅलेंटाईन्स डे’. आज क्लास कोण अटेंड करणार? आज वसंतपंचमीपण होती. वसंतऋतूच्या आगमनाची वर्दी देणारी ही पंचमी. क्लासमध्ये जेवढे विद्यार्थी होते त्यांना तिने सरळच विचारलं, “आज काही शिकवू, का सुट्टी घ्यायची? तुमचा आज वेगळाच मूड असणार, जे मी समजू शकते.”
ज्यांना लेक्चर अटेंड करायचं होतं तेच थांबले होते, त्यामुळे त्यांनी तिला शिकवायला सांगितलं. आज तिने वसंतऋतूच्या आगमनाची कविता शिकवायला सुरुवात केली. तिच्याच भावना तिने शब्दांतून व्यक्त केल्या होत्या.
“सर्जनाचा असे हा उत्सव,
जोश, प्रेरणा, नवकल्पनेचा उत्सव.
उधाणलेल्या मनाचा, अनुरागाला प्रीत भेटण्याचा हा मास,
भ्रमरांच्या आकंठ मधुप्राशनाचा हा मधुमास.
कोकीळ उधळती आसमंती स्वरतुषार,
नवसंजीवन फुलवणारा हा ऋतूंचा सरताज.”
ही कविता म्हणताना तिचे पाणावलेले डोळे बघून सगळी मुलं चिडीचूप बसली होती. क्लासची वेळ संपून सगळी मुलं बाहेर गेली तरी ती तशीच बसून होती.
एवढ्यात तिचा मोबाईल वाजला. तिने न बघताच तो यंत्रवत उचलून हॅलो म्हंटलं.
“मुग्धा”, पलिकडून तिच्या प्राणप्रिय श्रीचा प्रेमाने ओथंबलेला आवाज ऐकून तिने एकदम चमकून स्क्रीनवरचं नाव वाचलं.
श्री? खरंच तो बोलतोय? मला भास तर होत नाहीये ना? तिचा विश्वासच बसत नव्हता या अकल्पित घटनेवर.
“श्री, कुठे आहेस तू? मी.. मला..मला काही कळत नाहीये.”
फोनवर तिचा भांबावलेला सूर ऐकून श्री हसला आणि म्हणाला, “आपल्या घरीच आहे मी. तू लगेच ये.”
वाऱ्याच्या वेगाने मुग्धा घरी पोचली. तिच्या आईने दार उघडल्यावर तिने समोर पाहिलं. तिचा श्री समोरच बसला होता. त्याला पाहून तिचा चेहरा आनंदाने नुसता फुलून आला, डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वहायला लागल्या. नंतर मात्र व्हीलचेअरकडे
बघून तिच्या चेहऱ्यावर अचानक फेरफार झाले; पण क्षणभरच. पुढच्याच क्षणी ती त्याच्या मिठीत बद्ध झाली. तिची आई सूज्ञपणे आत निघून गेली होती. खरंतर इतकं बोलायचं साठलं होतं; पण दोघांनाही काय बोलावं ते कळतंच नव्हतं. जेमतेम तीन महिन्यांचाच विरह होता तरी दोघांनाही युगानुयुगे लोटल्यासारखी वाटत होती.
मुग्धाने मग धीर एकवटून त्याच्या पायांकडे निर्देश करून विचारलं, “श्री, हे कसं झालं?
कितपत दुखापत आहे?”
“मुग्धा, मागचा महिनाभर इतक्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत की आमच्या सहनशक्तीचासुद्धा कस लागला होता.
आम्ही दोन महिने, त्या अतिरेक्यांना अगदी पुरुन उरलो होतो. मग त्यांनी आमच्यातल्या एकेकाला बेसावध गाठून त्यांच्या छावणीत बंदी बनवून ठेवलं आणि कमालीचं टॉर्चर करायला सुरुवात केली. तुला खरं सांगतो, अगदी वेड लागायच्या काठावर येऊन मी पोहचलो होतो. हा सततचा मानसिक छळ सहन नव्हता होत. तोच तर त्यांचा हेतू होता. एका फटक्यात आम्हाला मारायचं नव्हतंच त्यांना. अतिशय विकृत मनोवृत्ती गं. मी केवळ इच्छाशक्ती आणि तुझं प्रेम या जोरावर सहन करत होतो, आणि संधी साधून एक दिवस निसटलो.
आमच्या हेडक्वार्टरजवळ कसाबसा येऊन पोचलो तर ते बॉम्बस्फोटामुळे पार जमीनदोस्त झालं होतं. माझे कित्येक सहकारी इतक्या विद्रूप अवस्थेत मृतावस्थेत पडलेले दिसले की चांगुलपणावरचा विश्वास क्षणात नाहीसा झाला. युद्ध, गोळीबार, बॉम्बस्फोट..बास, फक्त हेच अंतीम सत्य आहे असं वाटायला लागलं. एवढयात कुठूनतरी एक गोळी माझ्या दिशेने आली आणि उजव्या पायात घुसली, मग दुसरी..तिसरी..
माझी शुद्ध हरपली. जाग आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. पायातल्या गोळ्या काढल्या होत्या. सुदैवाने आतपर्यंत खोल घुसल्या नव्हत्या. लिगामेंट इंज्युरी आहे असं डॉक्टरांनी सांगितलं; पण या मानसिक ताणामुळे चालण्याचा आत्मविश्वासच नाहीसा झालाय. फिजिओथेरपीला माझ्याकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसादच मिळत नाहीये असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. मेजर जनरल व्हायची स्वप्न बघणारा मी, साधं उभंही राहू शकत नाहीये.”
असं म्हणत उद्वेगाने श्री स्वतःच्या पायावर हाताने प्रहार करायला लागला.
मुग्धाने त्याला थोपवलं आणि त्याचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरत म्हणाली,
“श्री, आता मी आहे ना तुझ्याबरोबर. सगळं काही नीट होणारच आहे. एवढा खंदा ब्रिगेडिअर तू, लढायच्या आधीच शस्त्रं खाली ठेवलीस? अजून कितीतरी लढाया लढायच्या आहेत, आयुष्याच्या लढाईसकट.
त्या जिंकायच्याही आहेत, आणि एवढ्यातच हार मानलीस?
तू जे आत्ता वर्णन करत होतास, खरंच तुला सांगते, अगदी अशीच स्वप्नं मला सतत पडत होती. तुझ्याबरोबरीने मी पण लढत होते रे. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांबरोबर, भूतकाळातल्या आठवणींबरोबर, आपल्या सहजीवनात आलेल्या विरहाबरोबर..लिस्ट खूप मोठी आहे.”
आत्ता एकदम श्रीला जाणवलं, आल्यापासून आपण मुग्धाची साधी चौकशीही केली नाही. त्याची तिच्याभोवतीची मिठी दृढ झाली. त्या स्पर्शातून तिच्याविषयी वाटणारं प्रेम, काळजी अचूक जाणवून ती सुखावली.
दुसऱ्या दिवशीपासून मुग्धाचं, श्रीला आपल्या पायावर पूर्ववत उभं करण्याचं जणू एक खडतर व्रत सुरु झालं. कॉलेजच्या कामाचे दोन-तीन तास सोडले तर ती बाकीचा पूर्ण वेळ श्रीच्या तैनातीत राहू लागली. समुपदेशनाचं आपलं संपूर्ण कसब वापरुन, श्रीच्या मनात फक्त सकारात्मक विचार कसे येतील हे पाहणं एक मोठं आव्हान होतं; पण ती डगमगून जाणाऱ्यातली नव्हती. तिचं समुपदेशन, तिच्या स्पर्शातली जादू, तिच्या नजरेत, शब्दांत जाणवणारं त्याच्याविषयीचं अपार प्रेम आणि जोडीला फिजिओथेरपी, या सगळयाचा अतिशय चांगला परिणाम हळूहळू दिसून येऊ लागला. श्रीला उमेद, उभारी वाटायला लागली. मुग्धाला आता विश्वास वाटायला लागला, त्यांच्या आयुष्यात वसंताचं आगमन झालंय. येताना तो वसंत, त्यांच्या जीवनात चैतन्य, प्रेम, बहार यांची उधळण करत आला होता. दोघांच्याही मनात फुललेल्या या वसंताला आता
वादळ-वारा, ऊन-पाऊस या बाह्यगोष्टींची अजिबात धास्ती नव्हती.
आज तो सुदिन उगवला होता. तब्बल दोन महिन्यांनंतर, श्री कुठल्याही आधाराशिवाय हळूहळू पावलं टाकत चालत होता.
मुग्धाच्या व्रताची आज सांगता झाली होती.
त्याला असं चालताना बघून तिच्या मनात पूर्वी ऐकलेल्या गीताचे शब्द रुंजी घालत होते.
‘एक एक पाऊल उचली, चाल निश्चयाने,
नको बावरुनी जाऊ, नियतीच्या भयाने.’
-समाप्त
लेखिका –सौ.राधिका जोशी, पुणे