सावरे… अयजय्यो 

WhatsApp Group Join Now

सावरे… अयजय्यो 

एक पावसाळी संध्याकाळ संपत आलेली वेळ… अंधार झालेलाच होता. पावसाचा खेळ जामच रंगत आलेला होता … तो लवकर संपणार नाही हे कळतही होतं. वेगवेगळी गाणी ऐकत कामे आटोपणे चालू होते. त्याच मूडमध्ये जेवणे झाली. अचानक play list मधे मालिनीताई राजूरकरांचं ‘नभ निकस गयो चंद्रमा ‘ सुरु झालं. मला रागदारी फार काही समजत नाही. राग ओळखता येत नाहीत. पण रागदारीमधली काही गाणी राग कळत नसली तरी खूप आवडून जातात. मनाला भिडतात… एका वेगळ्या जगात घेऊन जातात. तशी ही ‘ मालकंस ‘ रागातली बंदिश … संपूर्ण मूडच बदलून टाकते. 

त्यानंतर सुरु झालं किशोरीताईंच ‘सहेला रे’!!  कुवत नसतांना ह्या सगळ्यावर काय बोलणार ? पण मला एका अद्भुत जगात जायला मिळत. वा-याशिवाय उडायला मिळतं. असं वहात असतांनाच प्रभाताई अत्रेंचं सुरु झालं ‘जमुना किनारे मोर गाव ….. सावरे, अयजय्यो …’ 

इथे माझी व्यवहारी जगातली सगळी गणितं संपतात. एका अद्भुत जगातली सफर सुरु होते. सगळ्या जाणिवा एका अलवार भावनेपाशी येऊन थांबतात. शरीरभर एक हलकासा नाद संथपणे वाहत  असतो. आयुष्यातली सगळी दुःख, कष्ट, उदासी, वाईट अनुभवांचे ओरखडे सगळं सगळं एका संथ लयीत वहात  वहात माझ्यातून बाहेर पडतात.   

गीतकार शब्द लिहितो, संगीतकार ते लयीत गुंफतो, गायक ते घडवलेलं रत्न आपल्यासमोर मांडतो. प्रत्येकाचा भाव वेगळा, प्रत्येकाच्या मनातले विचार वेगळे, तद्वत… ऐकणारा ते वेगळ्याच भावनेने ऐकतो. ही चीज, हे भजन नक्की कोणत्या अर्थाचे आहे? कोणाला उद्देशून आहे? सरळ सरळ कळतोय तो भाव खरंच आहे की अजून काही भावार्थ दडलाय ? राधा खरंच अस्तित्वात  होती का ? ह्या कोणत्याही प्रश्नात मी पडत नाही. तसंच हे आत्तापर्यंत कित्येक तालेवार गायकांनी गायलंय. कोणाला कुमार गंधर्वांच आवडतं, कोणाला वसंतरावांच आवडतं, कोणाला ‘यशवंत ‘ सिनेमातलं नाना पाटेकरांच्या background वर  असलेलं रवींद्र साठेंनी गायलेलं आवडू शकतं. मला प्रभाताई अत्रेंचं आवडतं.

प्रभाताईनी सुरुवातीला घेतलेल्या आलापांबरोबरच मी एका वेगळ्या अद्भुत जगात शिरते. हळूहळू नदीकाठाने चालू लागते. हुरहूर लावणारी सुखद थंडी असणारी सूर्यास्ताच्या वेळची संध्याकाळ असते….

जमुना किनारे मोरा गाव 

सावरे अयजय्यो …. सावरे अयजय्यो….. सावरे अयजय्यो 

ये रे सावळ्या, मला भेटायला ये की … यमुनेच्या किनारी मला भेटायला ये  … माझं गाव तुला आवडेल असंच आहे … जमुना किनारे …. साsssssss वरे अयजय्यो … अयजय्यो सावरे 

तू तर तुझ्या भक्तांना दर्शन देतोस असं म्हणतात. त्या भक्तांच्या भक्तीची परीक्षा घेतोस का? भेटीकरता काही मापदंड असतात का? नाहीत न ? आणि असले तरी ते मला पण लागू आहेत का? नसतीलच न?  नको लावूस कोणतेच मापदंड …. तू फक्त मला भेटायला ये….  साsssssss वरे अयजय्यो … अयजय्यो सावरे   ..

राधा हे प्रेमाचे हळुवार रूप आहे. राधा खरंच होती का? ह्याचा विचारही हे ऐकत असतांना मनात येत नाही. मनातल्या मनात त्या नदीच्या काठाकाठाने चालतांना थोड्याच अंतरावर कृष्णाची आतुरतेने वाट  पाहणारी राधा मला दिसते. तो भेटायला येणार म्हणून  आतापासूनच त्याच्या रंगात रंगून गेलेली ती ‘राधा रंगीली’  खूप मोहवून टाकते. 

जमुना किनारे मोरी ऊंची  हवेली….

मै ब्रिज की गोपिका नवेली….. 

राधा रंगीली मेरो नाम…. 

सावरे अयजय्यो ….. सावरे….SS….. 

खरच, समर्पण स्त्री च्या रक्तातच असते का? कारण ते तिला कधी शिकवावे लागत नाही. स्वत्व विसरणे, विलीन होणे, सावली होणे, आपल्या सहचा-याच्या रंगात मिसळून जाणे ते तीच करू शकते. एरवी धीट, धाडसी, स्वाभिमानी असलेली राधा ह्या भजनात प्रेम विव्हल होऊन कृष्णाला वेगवेगळ्या गोष्टींची लालूच दाखवते. यमुनेच्या तीरावर माझा भव्य वाडा आहे, तू तिथे ये. तुझ्या येण्याच्या कल्पनेने मी चैतन्याने भरून गेले आहे, सगळे वातावरण बदलले आहे. माझ्याबरोबरच सगळा आसमंत तुझ्याच रंगात रंगून गेला आहे… सावरे… अयजय्यो ….

स्त्री स्वत्व विसरते ते हेच का? व्यवहारी जगात  पुरुष स्त्रीकरता काय काय करतो हे आपल्या मनावर सतत बिंबवले जाते. मात्र स्त्री काय काय करते ते तिचे कर्तव्य मानले जाते आणि  वर्षानुवर्ष ती हे आनंदाने स्वीकारते आहे. ती सहचारीला प्रेमी बरोबरच पुत्र भावनेने पण सांभाळते. इथेही राधा त्याला पूजते आहे. अपत्य भावनेने ती काय काय करणार आहे त्याचे वर्णन ती करते. जरी प्रभाताईंनी ती कडवी गायलेली नसली तरी मूळ भजनात ते लिहिलेले आहे. प्रेमाच्या अनेक धाग्यांमधला हाही धागा ती गुंफत असते.

कृष्ण म्हणजे कोण हो? देव? चमत्कार? दृष्टांत देणारा? भर रणांगणात गीतेद्वारे आयुष्याचे ज्ञान देणारा ज्ञानी? विष्णूचा आठवा अवतार? सुदाम्याचा मित्र? राधेचा प्रेमी? किती कथा, किती दंतकथा, किती भजनं, किती गाणी ह्याला गणतीच नाही. ‘कृष्ण ‘ शब्द उच्चारला तरी सखा, मित्र, पाठीराखा ही भावना मनात निर्माण होते. आपल्या मनातील आपण सगळ ह्याच्याजवळ बोलू शकतो, आपल्या संकटांमधून हा मार्ग काढून दाखवेल अशी खात्री असते.

हे भजन मला आशेचा किरण वाटतं. उद्याची आशा, ज्यावर आपण सारे आज उत्साहाने जगत असतो. उद्या तो नक्की येईल आणि माझे जीवन कृतार्थ होईल, उद्या तो येईल आणि माझ्या मनाला, डोळ्यांना एक अतीव समाधान आणि जगण्याची उर्मी मिळेल, अतूट समाधान मिळेल. पुढच्या कित्येक दिवसांच्या जगण्याला बळ मिळेल. तसेही आपण नेहेमी ‘उद्याच्या आशेवर’च जगत असतो. ‘उद्या ‘ नक्की काहीतरी छान घडणार आहे त्यामुळे मी आज उत्साहात असते. भूतकाळाची दोरी फार ताणायची नसते. सुधीर मोघे लिहितात ,’भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर…

… खेळ जुना हा युगायुगांचा , रोज नव्याने खेळायाचा ‘ 

ह्या नव्या डावाकरता उद्याची सकाळ नक्कीच उत्साहाची असणार ह्या आशेवर आपण आजच्या दिवसाची कर्म करतो. ह्या ‘उद्याच्या’ तयारीवर आपले कितीतरी ‘आज’ आनंदात जातात. ही उद्याची आशा आपल्याला जगण्याची उमेद देते. रोजची दुःख, निराशा, कंटाळा ह्यांचे सावट ‘उद्या ‘ घडणा-या घटनेच्या आशेवर कमी होते. कधीकधी ही ‘उद्याची ‘ उमेद आपल्याला आजच्या प्रश्नांना उत्तरे सापडवून देते. 

खरच, तू ये सावळ्या …. ह्या माझ्या गावात ये, मला भेटायला ये, तुझ्या येण्याच्या नुसत्या कल्पनेने इथे इतका उत्साह, आनंद निर्माण झाला आहे, तर तुझ्या प्रत्यक्ष येण्याने काय काय होईल….

जमुना किनारे मोरा गाव

सावरे अयजय्यो …. सावरे अयजय्यो….. सावरे अयजय्यो 

दुसर्या कडव्याच्या सुरवातीला प्रभाताईंची ‘अयजय्यो ‘ वरची लाडीक तान तर मला अंतर्बाह्य हलवून टाकते. इतकी आर्जवी की आता तो येणारच ही खात्री आपल्यालाही वाटायला लागते. राधा आता अंतर्बाह्य त्या सावळ्याची झालेली असते. मनातून ती त्याच्याबरोबर असतेच… तो आलेला आहे, बासरी चे मोहक स्वर सगळीकडे भरलेले आहेत  आणि जमुना किनारी ते दोघे एकमेकांना भेटलेले आहेत. तिच्याबरोबरच सगळा परिसर त्याच्या रंगात रंगून गेलेला आहे. राधा ही राधा राहिलेली नाही, ती आता तिच्या सावळ्यात मिसळून गेलेली आहे. तिला कशाचेही भान नाही…

सुन मुरली मै भई रे दिवानी…

सुध बुध खोयी चैन गवायी  (इथेही प्रभाताई अतिशय हळुवार होतात)

ध्यान लग्यो  है तेरो नाम…

सावरे अयजय्यो …. सावरे अयजय्यो….. सावरे अयजय्यो 

जमुना किनारे…… 

तो सखा 

तो मित्र

तो देव 

तो सर्वत्र 

तू येणार असशील तर सखा म्हणून ये… तू सखा म्हणून येणार असशील आणि सदैव साथ देणार असशील तर मी कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते. मी तुझी निरंतर भक्ती तर करतेच पण माझे प्रेमही तू जाणतोस. कोणती भावना जास्त श्रेष्ठ आहे हे मीच काय तूही ठरवू शकणार नाहीस… आणि ठरवूही नकोस…. कारण तुझंही माझ्यावर प्रेम आहेच. त्या प्रेमाला जागून तू ये कृष्णा ….

सावरे अयजय्यो …. सावरे अयजय्यो….. सावरे अयजय्यो !!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top