संस्कृतीचे महत्व

WhatsApp Group Join Now

जगामध्ये कुठेही जा तिथल्या समाजाची एक वेगळी ओळख असते . ती ओळख त्यांच्या संस्कृतीमुळे निर्माण होते . जेवढी संस्कृती प्रगल्भ असते तेवढाच तो समाज . म्हणून संस्कृती ही कुठल्याही समाजाचा आत्मा असते . संस्कृती म्हणजे केवळ सण ,समारंभ किंवा आपला पेहराव नव्हे, संस्कृती ही त्या समाजाच्या विचारांचा, आचाराचा,मूल्यांचा ,जीवनशैलीचा व आस्थेचा संग्रह असतो . समाज,मग तो कुठलाही असो त्याची प्रगती केवळ आर्थिक किंवा तांत्रिक या चौकटीत मोजता येत नाही . तर त्या समाजाची प्रगती सांस्कृतिक समृद्धतेवरही अवलंबून असते .

संस्कृतीमुळे समाजाला योग्य दिशा मिळते . त्यामुळे समाजात मूल्य रुजवायला मदत होते . जसे आदरभावना, सहकार्य करण्याची भावना ,प्रामाणिकपणा हे गुण संस्कृतीमुळे समाजात विकसित होतात . संस्कृतीमध्ये पुढची पिढी घडवण्याची ताकद असते . लहानपणापासून जे संस्कार मुलाला मिळतात त्यातून त्याचे व्यक्तिमत्व घडते . पर्यायाने आपण म्हणू शकतो एक चांगला , सभ्य समाज घडवायची ताकत संस्कृतीत असते . त्यामुळे आपण आपली संस्कृती जतन केली पाहिजे . ती पुढच्या पिढीकडे सुपूर्द केली पाहिजे .

सण ,समारंभ ,उत्सव ,लोक कला ,रितीरिवाज ,अनेक प्रकारच्या कला यामुळे समाज एकत्र येतो . त्यातून समाजात बंधुभाव वाढून सामाजिक एकोपा वाढण्यास मदत होते . उदाहरणार्थ दिपवाळी, दसरा, होळी, गणेशोत्सव आशा सणांना आपण एकत्र येतो व त्यातून सामूहिक एकतेची भावना वाढते . सण, समारंभाच्या वेळी एकत्र येण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि यातून आपलेपणा वाढून सामाजिक एकोपा वाढण्यास मदत होते . यातूनच आपल्या आचारा ,विचाराची, देवाण-घेवाण होते व पुढच्या पिढीकडे ती नकळतपणे सुपूर्त केली जाते .

 वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळी संस्कृती असते . त्यामुळे समाजामधील रितीरिवाज ,सण, समारंभ, एखादा उत्सव साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आपण सर्व समाजाच्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे . त्याचबरोबर आपण आपला इतिहास जाणून घेऊन आपल्या संस्कृतीबद्दलही अधिक जाणून घेतले पाहिजे . आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या कथा, त्यांचे अनुभव हा सुद्धा एक सांस्कृतिक ठेवा आहे . तो आपण जतन केला पाहिजे . कारण आपल्या अस्तित्वाचा आधार संस्कृती आहे . आपली संस्कृती जतन करत असताना आपण इतर समाजाच्या संस्कृतीचाही आदर करणे तेवढेच गरजेचे आहे . आपल्या देशामध्ये विविधता आहे . आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो . आपले पेहरावही वेगवेगळे आहेत . असे असले तरी, आपण या विविधतेतून एकता साधली आहे . हेच आपल्या संस्कृतीचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे .

आपली भारतीय संस्कृती फार प्रगल्भ आहे . त्यातून आपण आपल्या सर्जनशीलतेला वाव देऊ शकतो . आपले समृद्ध साहित्य ,विविध प्रकारच्या कलेचा ठेवा जसे चित्रकला, शिल्पकला ,संगीत ,नृत्य यातून आपल्या समाजाला सर्जनशील व स्वावलंबी बनवू शकतो . भारतीय संस्कृती ही कलांनी समृद्ध असलेली संस्कृती आहे . अशा कलांमुळे समाजामध्ये चैतन्य राहते . अशा प्रकारच्या संस्कृतीक कलांचे जतन केल्यामुळे समाजामध्ये विकास घडवून येतो आणि मनोरंजनाबरोबरच आपल्या प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला मिळू शकतात .

संस्कृतीमुळे समाज शिक्षण घडते व त्यातून एक चांगला समाज उदयाला येतो . कुटुंब ,शाळा ,समाज यातूनच भावी समाज घडत असतो . जर मुलांमध्ये लहानपणापासून संस्कार रूजवले तर येणारा समाज निश्चितच सुसंस्कारी सभ्य असेल.

एखाद्या व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये त्याच्यावर झालेल्या संस्काराचा मोठा प्रभाव दिसून येतो . एखाद्या समाजाची संस्कृती, तो समाज घडवित असते . संस्कृतीमध्ये समाज घडवण्याची ताकद असते . त्यामुळे आपण आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे . शिवाय काळानुसार त्याच्यामध्ये बदलही आपल्याला स्वीकारता आले पाहिजेत.

ग्लोबलायझेशन मुळे आपल्यावर अनेक गोष्टीचा प्रभाव पडत आहे . दुसऱ्याच्या जीवनशैलीचे किंवा संस्कृतीचे आपण आंधळेपणाने अनुकरण टाळले पाहिजे . दुसऱ्याच्या संस्कृतीचा आपण आदर जरूर करावा पण त्याचे अंधानूकरण नको . समाज म्हटल्यानंतर इतरांच्या आचार- विचाराचा ,राहणीमानाचा आपल्यावर प्रभाव पडणे साहजिक आहे . एखाद्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची आपल्यामध्ये लवचिकता असली पाहिजे . त्याच बरोबर आपल्याला अंधानुकरण टाळता आले पाहिजे . इतर संस्कृतीच्या प्रभावामुळे चांगल्या गोष्टी स्वीकारताना चुकीच्या गोष्टीला नाही म्हणता आले पाहिजे .त्यातूनच आपण एक आर्थिक प्रगतिशील समाजाबरोबरच सांस्कृतिक समाजाची घडण करू शकू . जी येणाऱ्या काळाची गरज आहे .

संस्कृती त्या समाजाचा आत्मा असतो त्यामुळे समाजाची प्रगती योग्य मार्गाने होते . म्हणून आपली संस्कृती आपण जपली पाहिजे तो एक अमूल्य ठेवा आहे . संस्कृतीचे जतन करणे हे प्रत्येकाची जबाबदारी असते , याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे . संस्कृती ही समाजात उदयाला येते आणि समाजातच विकसित होते . त्यामुळे संस्कृतीचे जतन ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे . 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error:
Scroll to Top